%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
प्रभात फिल्म कंपनीत संत ज्ञानेश्वर हा चित्रपट तयार होत असताना आठवले यांची ज्ञानेश्वरीशी झालेली ओळख त्यांनी प्रयत्नपूर्वक वाढवली. त्यांनी त्या ग्रंथाची नुसती पारायणे केली नाहीत तर तिचा सर्वांगीण अभ्यास केला, काया वाचा मने करुन भक्तीभावाने आराधना केली. त्यांना ज्ञानेश्वर कवी म्हणून भावले, तत्ववेत्ते म्हणून थोर वाटले, ते आंधळ्या दंभाला आव्हान देणारे बंडखोर आहेत हे पटले, दृष्यकथा वाचकासमोर उभी करणारे आपल्यासारखे चित्रपट क्षेत्रातले कलाकार आहेत हे जाणवले आणि सर्वात महत्वाचे – जो खरा ज्ञानी असतो त्याची अशी जीवनदृष्टी तयार होते की वृत्तीत निर्भेळ विनोद मुरतो, तसा तो ज्ञानेश्वरांच्यातही ओतप्रोत होता हेही कळले.
ही ईश्वरासारखी विविध रूपे असणारे ज्ञानेश्वर हेही ज्ञानाचे आणि शब्दसृष्टीचे ईश्वरच आहेत हे जे आपल्याला प्रतीत झाले आहे ते सकलांना सांगावे म्हणून आठवले यांनी ३५० हून अधिक पानांचा ग्रंथ लिहिला. गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायासारखे या ग्रंथातही अठरा लेख आहेत. ज्ञानेश्वरीतील ग्रामीण जीवन, स्त्री विश्व, आहारशास्त्र, पूर्वजन्म आणि गुप्तधन याचे विवेचन, श्रीकृष्णदर्शन असे सर्व पैलू उलगडून दाखवले आहेत. ज्या ज्या वेळी ज्ञानेश्वरांना काहीतरी पराकोटीचे, उत्कटतेने सांगायचे असते तेव्हां तेव्हां ते त्या ओवीत 'पतिव्रता' ही उपमा वापरतात असाही एक अत्यंत हृद्य आणि आठवले यांच्यासारख्या श्रेष्ठ कवीलाच दिसेल असा निष्कर्ष आठवले यांनी एकंदर त्रेपन्न उदाहरणे देऊन काढला आहे. त्यातील शेवटच्या लेखाचे शीर्षक आहे 'ज्ञानेश्वर महाराज होते तरी कसे?'