%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
प्रभात फिल्म कंपनीत व्यतीत केलेल्या काळातील आठवणींवर आधारित 'प्रभात फिल्म कंपनी'चा इतिहास आठवले यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांना कथन केला आहे. जे त्यांनी पुढे आयुष्यात केले त्याचा वसा किंवा त्याचे संस्कार त्यांना त्यांच्या बालपणात कसे प्राप्त झाले, प्रभातमध्ये पदार्पण होण्यास त्यांच्या तारुण्यातील काही घटना कशा कारणीभूत ठरल्या हेही त्यांनी थोडक्यात सांगितले आहे. प्रभात चित्रांच्या आणि काही गीतांच्या जन्मकथा, प्रभातमधील श्रेष्ठ कलाकारांच्या महानतेच्या गाथा यांचा त्यात समावेश आहे. व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, एस.फतेलाल ऊर्फ साहेबमामा, के.नारायण काळे, केशवराव भोळे, शांता आपटे, राजा नेने, शंकरराव दामले, अभिनेते केशवराव दाते, कथा आणि संवाद लेखक शिवराम वाशीकर, कॅशिअर वासुनाना देसाई, तबलजी बळवंतराव रुकडीकर अशा काही व्यक्तींची शब्दचित्रे हेही त्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य आहे.
प्रभात ही 'संस्था' म्हणून आणि तिचे व्यवस्थापन कसे आदर्श होते हेही त्यात दाखविले आहे. त्यात काम करणारा प्रत्येकजण 'आपण प्रभातचे पुजारी आहोत' या भावनेने काम करीत असे. संशय आणि आळस यांना तिथे मज्जाव होता. साधेपणा हा तिथला विशेष होता. नाविन्यपूर्ण, आनंददायी, उद्बोधन करणाऱ्या रम्य कलाकृती निर्माण करणे हे एकच ध्येय, हा एकच शौक आणि ही एकच चैन त्यांना ठाऊक होती. "शांतारामबापूंचे कुशल नेतृत्व, प्रतिभाशाली दिग्दर्शन, विष्णुपंत दामले यांची व्यावहारिक निपुणता, दक्ष, संयमी कार्यकुशलता, साहेबमामांचे कल्पनेच्या पंखांवर आरूढ झालेले कलाचातुर्य यांचा त्रिगुणात्मक संगम म्हणजे 'प्रभातचित्र' अशी व्याख्या आठवले यांनी केली आहे. त्यांच्या नजरेतून लिहिला असला तरी मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा इतिहास या दृष्टीनेही या पुस्तकाला फार मोठे स्थान आहे.